लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तळा बाजारपेठ पूर्णतः बंद.
महाराष्ट्र २४ आवाज
(तळा श्रीकांत नांदगावकर) रायगड जिल्ह्यात पालकमंत्री आदिती तटकरे यांनी १५ ते २६ तारखेपर्यंत जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तळा बाजारपेठ पूर्णतः बंद ठेवण्यात आली. रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता दि.१३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद घेऊन कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी रायगड जिल्हा १५ जुलैच्या मध्यरात्री पासून २६ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
लॉकडाऊन काळात भाजीपाला व किराणा दुकानदारांना पार्सल सेवा देण्यास मुभा देण्यात आली असून त्यासाठी लागणारे पास तहसीलदारांकडून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील भाजीपाला व किराणा व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेऊन फक्त पार्सल तसेच घरपोच सेवा सुरू केली आहे. तळा पोलिसांकडून शहरातील बळीचा नाका येथे बंदोबस्त ठेवण्यात आला असून विनाकारण बाजारात फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. १२ दिवस पूर्णपणे बाजारपेठ बंद राहणार असल्याने तालुक्यातील नागरिकांनी लॉकडाऊनच्या दोन दिवस आधी मोठी गर्दी केली होती. मात्र गुरुवारी लॉकडाऊनच्या सुरुवातीस नागरिकांनी घरीच राहणे पसंत केल्याने तळा बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.