जिल्ह्यातील लॉकडाऊन सामान्य जनतेला तारणार की मारणार?
महाराष्ट्र २४ आवाज
रायगड : (श्रीकांत नांदगावकर) कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जिल्ह्यात १५जुलै ते २६ जुलै असा बारा दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला.मात्र कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी केलेला हा लॉकडाऊन दोन दिवस आधी अचानकपणे जाहीर करण्यात आल्याने नागरिकांना बारा दिवस पुरेल एवढे किराणा,भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागले. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईतील चाकरमानी आपल्या गावी परतले आहेत आधीच हाताला कामधंदा नाही त्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मोठया प्रमाणावर घर,शेती,बाग बागायती यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यामध्ये प्रशासनाने बारा दिवसांचा लॉकडाऊन घोषित केल्यामुळे हा लॉकडाऊन सामान्य जनतेला तारणार की मारणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कारण जनतेच्या सुरक्षेसाठी निर्णय जरी वरकरणी योग्य दिसत असला तरी गेले चार महिने लॉकडाऊन सुरू आहे छोटे मोठे व्यवसाय बंद आहेत रिक्षा,मिनिडोअर,टॅक्सी,सलून चालक,बांधकाम मजूर असे अनेक लोक जेव्हा काम करतात तेव्हाच त्यांची चूल पेटते त्यांचे काय खाजगी नोकरी करणाऱ्या नोकरदारवर्गाला चार महिन्यांपासून पगार नाही. आणखी किती दिवस काढणार कसे चालणार असे प्रश्न या सर्वांना नेहमी सतावत असतात.दुकाने बंद कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नाही त्यामुळे रोज लागणारा किराणा सामान,भाजीपाला,दूध,गॅस,कसे घेणार जीवन जगायचे तरी कसे? अशी अवस्था सामान्य जनतेची झाली आहे.घरी बसुन उपासमारीने मारायची वेळ आली आहे त्यापेक्षा काम करून कोरोना होऊन मेलो तरी चालेल किमान घरात अबाल वृद्धांची मुला बाळांची उपासमारीने होणारी तडफड तरी पहावी लागणार नाही अशी भावना देखील जनतेत रुजू लागली आहे.कोरोना विषाणूचे हे संकट नक्कीच मोठे आहे परंतु त्यावर लॉकडाऊन हा एकमेव उपाय नाही.प्रशासनाने या रोगाबद्दल जनमानसात जनजागृती करण्यावर जर भर दिला,अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांच्या मदतीने घरोघरी जाऊन नागरिकांची थर्मल स्क्रिनिंग करून तपासणी केली तसेच नियम आखून उद्योग धंदयाना परवानगी दिली, नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना केल्या तर परिस्थिती नक्कीच बदलेल.परंतु प्रशासनाने कोणतीही पूर्व उपाययोजना न करता घोषित केलेलं लॉकडाऊन सामान्य जनतेला तारणार की मारणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.