हजारीबाईंच्या आयुष्यात पहिल्यांदाच मिळाले रेशनचे धान्य.
महाराष्ट्र 24 आवाज
जिल्हा प्रतिनिधी- व्यंकटराव पनाळे
लातुर :- तालुक्यातील हरंगुळ (बु) शिवारामध्ये कळंब रोड पासुन जवळच असलेल्या राजे नगरात मागील १५ वर्षापासून उत्तरप्रदेश मधून पोटापाण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या हजारिबाईने रस्त्यावरच चार लाकडे उभे करून त्याच्यावर प्लॅस्टिकचे चवाळे आणी भोरगे टाकून राहात त्या असत. लागेल ते काम करून आपला उदरनिर्वाह आणि आपल्या मुलाबाळांचे पालन-पोषण हजारिबाई करत असत. लॉकडाउनच्या कालावधीमध्ये हरंगुळ बु. येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे हे आपल्या भागामध्ये कोणी या संचारबंदीच्या आणि लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अन्नधान्या वाचून उपाशी राहू नये म्हणून तसा सर्वे करत फिरत असताना त्यांच्या नजरेत हजारीबाई कमलसिंग राजपूत यांची दुरावस्था लक्षात आली. त्याचा व्हिडिओ करून आणि बातमी करून ती व्यथा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून व्यंकटराव पनाळे यांनी प्रशासनासमोर व समाजासमोर मांडली. या बातमीची दखल घेऊन पत्रकार बाळ होळीकर यांनी सदर महिलेस रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी लातूर तहसीलचे नायब तहसीलदार सुधीर देशमुख यांची भेट घेवुन त्यांना हजारीबाईची व्यथा सांगितली. प्रशासनाने राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिवशी या महिलेस रेशन कार्ड देऊन सामाजिक न्याय केला.
हजारीबाईंना आज शुक्रवार दिनांक ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हरंगुळ (बु) येथील स्वस्त धान्य दुकानदार सुभाषराव वाघमारे यांच्या दुकानात हरंगुळचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते रेशनचे स्वस्त धान्य वाटप करण्यात आले. हजारीबाईंच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच आज रेशनचे धान्य मिळाले असल्यामुळे त्यानी प्रशासनाचे व व्यंकटराव पनाळे आणि बाळ होळीकर यांचे आभार मानले आहेत. आज हजारीबाई राजपूत यांना स्वस्त धान्य वाटपाच्या प्रसंगी बाबुराव कोतवाड, संतराम बरुरे, बालाजी अंगदराव पाटील, शिवाजीराव आडे, संदीप वाघमारे, चिन्नु शर्मा, निराशादेवी ठाकूर तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थित होते.