विद्यार्थ्यांचे आरोग्य हिच प्राथमिकता.
शिक्षणमंत्री, प्रा. वर्षा गायकवाड
महाराष्ट्र २४ आवाज
प्रतिनिधी- उदय नरे
मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे दिसत असले तरी राज्यातील शाळा दिवाळी नंतरच सुरू करण्याचा विचार करण्यात येईल कारण विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा हे आमचे प्रमुख ध्येय आहे असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या रोगाचा प्रादुर्भाव पाहून टप्प्या-टप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येतील. इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष असल्याने या वर्गांचा शाळा सुरू करताना प्रामुख्याने विचार केला जाईल. सरसकटपणे शाळा सुरू करून विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याशी सरकार खेळणार नाही व त्यांचे आरोग्य धोक्यात घालणार नाही असे मत शिक्षण मंत्री महोदयांनी व्यक्त केले.
केंद्र व राज्य सरकारने निर्धारित केलेल्या आरोग्य विषयक सर्व सुचनांचे व खबरदारीचे उपाय करूनच स्थानिक पातळीवर शैक्षणिक संस्थांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल.
शिक्षण हक्क कायद्याच्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण हे मिळालेच पाहिजे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने पालकांची आर्थिक परिस्थिती खराब झाली असल्याने त्यांना टप्पा-टप्प्यात फी भरण्याची मुभाही देण्यात आली आहे जर विद्यार्थी फी भरुन शकला नाही तरी शाळा अशा विद्यार्थ्यांना आँनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही. जर शाळा प्रशासनाने विद्यार्थीयांना शिक्षण पासून वंचित ठेवले तर अशा शाळांवर कारवाई केली जाईल असा इशारा शिक्षण मंत्री महोदयांनी दिला. अशा शाळा विरूद्ध स्थानिक शिक्षण अधिकार्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया मराठा आंदोलनांच्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे वेळ लागत आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे लवकरच बैठक घेऊन विद्यार्थीहिताचा निर्णय घेतील असे आश्वासन शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले.